Friday, June 14, 2019

काशी

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

पूर्व उत्तर प्रदेशातील गंगा किनाऱ्यावर वसलेली शिवमहिमामंडित काशी नगरीची गणना विश्वातील प्राचीनतम नगरीमध्ये होते. वरूणा नदी आणि असी गंगेच्या मध्ये काशी नगरी वसलेली असल्यामुळे हिला वाराणसी असेही म्हटले जाते. बौद्ध जातक कथांनुसार महाजनपदाची काशी ही राजधानी भारतातील सहा प्रमुख नगरांमध्ये सर्वात मोठे नगर होते. अनेकविध विद्याशाखांचे अध्ययन केंद्र, भिन्न-भिन्न संप्रदायांचे तीर्थस्थान आणि
परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करण्यास उपयुक्त स्थान असे काशीचे महात्म्य आहे. काशी क्षेत्रामध्ये शैव, शाक्त, बौद्ध आणि जैन पंथांची प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. काशीमधील विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काशीमध्ये शक्तीपीठ सुद्धा आहे. सातव्या आणि तेविसाव्या जैन तीर्थांकरांची जन्म व कर्मभूमी काशीच आहे. भगवान बुद्धांनी काशीजवळील सारनाथ येथे त्यांचे पाहिले धम्मप्रवचन केले होते. कोणत्याही नवीन पंथ, विचार, सुधारणांचा प्रारंभ काशीपासून करणे यशस्वीतेसाठी आवश्यक मानले जात असे. कबीर, रामानंद, तुलसीदास सारख्या भक्त व संतकवींनी काशीला त्यांची कर्मभूमी मानले होते. शास्त्राध्ययन आणि शास्त्रार्थाची काशीमध्ये अत्यंत प्राचीन परंपरा आहे. मोगल आक्रमक औरंगजेबाने येथील विश्वनाथ मंदीर उध्वस्त करून तिथे एक मशीद बांधली. कालांतराने या मशिदीजवळच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी नवीन विश्वनाथ मंदीर बांधले. या मंदिराच्या शिखरास महाराज रणजितसिंह यांनी सुवर्णपत्र्याने मढविले. काशी विश्वनाथाच्या मूळस्थानास मुक्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
आधुनिक काळात महामना मदनमोहन मालवीय यांनी इथे जगप्रसिद्ध काशी हिंदू विश्वविद्यालायाची स्थापना केली व शिक्षणक्षेत्रात काशीची परंपरा पुढे चालविली. येथील गंगातटावर दशश्वमेधघाट प्रसिद्ध आहे. इथेच भारशिव राजांनी आक्रमक कुशाणांना पराभूत करून दहा अश्वमेध यज्ञ केले होते.

मायापुरी (हरिद्वार)

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

पश्चिमी उत्तरप्रदेशात आणि आताच्या उत्तराखंडमध्ये गंगाकिनारी हे तीर्थक्षेत्र आहे. पर्वतांमधून निघून गंगा इथेच मैदानी प्रदेशात प्रवेश करते. हरिद्वारमध्ये प्रसिद्ध कुंभमेळा भरत असतो. त्यात लक्षावधी श्रद्धाळू भाग घेतात. ज्या वर्षी चंद्र-सूर्य हे मेष राशीत आणि गुरू कुंभ राशीत एकाच वेळी येतात तेव्हा कुंभाचा हा योग जुळून येतो. हरिद्वारमध्ये गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वकेश्वर, नील पर्वत (नीलकंठ महादेव) आणि कनखल नावाची पाच
प्रमुख तीर्थस्थाने आहेत. दक्षप्रजापतीने त्यांचा प्रसिध्द महायज्ञ कनखलमध्येच केला होता. या यज्ञाग्नीमध्ये सतीचे दहन होताच शिवगणांनी याचा विध्वंस केला होता.

मथुरा

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी असलेली ही प्राचीन नगरी पश्चिमी उत्तर प्रदेशात यमुना किनारी वसलेली आहे. या नगरीचे प्राचीन नाव मधुरा होते, कालांतराने मथुरा झाले असावे. ध्रूवबाळाने नारदमुनींच्या उपदेशानुसार इथेच मधूबनात घोर तपश्चर्या करून भगवंताचे दर्शन प्राप्त केले होते. त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या आज्ञेनुसार अत्याचारी
लवणासुराचा वध करून शत्रुघ्नाने मथुरेचे राज्य सांभाळले होते. द्वापार युगात श्रीकृष्णांनी अत्याचारी कंसाचा वध करून आपल्या अवतारकार्याचा श्रीगणेशा इथेच केला होता. कलियुगात शकांनी आक्रमण करून मथुरा व अवंतिकेवर अधिकार प्राप्त केला होता. या शकांना नंतर सम्राट विक्रमादित्याने पराभूत केले. मुस्लिम शासनकळात क्रूरकर्मा औरंगजेबाने श्रीकृष्णजन्मभूमीवरील मंदिराचा विध्वंस करून तिथे एक मशीद बांधली. मथुरा-वृंदावनचा परिसर श्रीकृष्ण भक्तांसाठी सदैव अपरंपार श्रद्धेचे केंद्र राहिला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करण्याचा करोडो कृष्णभक्तांचा ध्यास आहे, जो पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

अयोध्या

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।


शरयू नदीच्या किनारी वसलेली, प्राचीन कोसल परिसरातील, आत्ताच्या अयोध्या जिल्ह्यातील उत्तरप्रदेशातील अयोध्या ही प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असलेली प्राचीन नगरी आहे. इक्क्ष्वाकुवंशी राजांची ही राजधानी होती. श्रीरामांच्या सुविख्यात रामराज्यानंतर त्यांचे पुत्र कुश यांनी आपली राजधानी बदलली व अयोध्येत श्रीरामाच्या जन्मस्थानी एक भव्य मंदीर बांधले. कालांतराने सम्राट विक्रमादित्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या मंदिराचे नूतनीकरण करून जीर्णोद्धार करण्यात आला. ई. स. १५२८ मध्ये विदेशी क्रूर आक्रमक बाबराने या मंदिराचा विध्वंस करून त्यावर मशीद निर्मिण्याचा प्रयत्न केला. परंतु रामभक्तांच्या निरंतर सशस्त्र विरोधामुळे तो मशीद बनवू शकला नाही व त्याने बिना मिनारांचे तीन घुमट असलेला एक ढाचा बांधला. या ढाच्याखाली ध्वस्त केलेल्या मंदिराचे खांब, त्यांच्यावर कोरलेल्या मूर्त्या व मंगलकलशासहित अस्तित्वात आहेत. आज हे प्राचीन अवशेष संग्रहालयात ठेवलेले आहेत. मुख्य घुमटाखाली चंदनाच्या लाकडाचे खांब व प्रदक्षिणा मार्ग पण होता. साधू-संत-भक्त पिढ्या न पिढ्या इथे भजन पूजन करीत असत, परंतु क्रूर आक्रमक औरंगजेबाने त्याच्या सैन्यबळाच्या आधारे या पूजा-अर्चेवर बंदी आणली. श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी हिंदू समाज निरंतर संघर्ष करीत राहिला परंतु विदेशी शासकाने वारंवार विध्वंस केला. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसाची रचना अयोध्येतच केली आहे. विक्रम संवत १६३१ मध्ये गोस्वामीजी काशीहून अयोध्येत आले व श्रीरामनवमीच्या शुभदिनी रामचरितमानसाच्या रचनेस प्रारंभ केला. स्वाभाविकपणेच श्रीरामजन्मभूमीस्थानीच निवास करून त्यांनी ही रचना केली. त्यावेळी तीन घुमटांचा उध्वस्त ढाचा अस्तित्वात होता. गोस्वामीजींच्या शब्दात त्या काळात त्यांचा ध्यास होता, "माँगि कै खैबो मसीत को सोइबो लैबे को एक न दैबे को दोऊ".

देशातील प्रमुख संतमहात्म्यांच्या धर्मसंसदेतील निर्णयानुसार विक्रम संवत २०४६ मधील देवोत्थान एकादशीस श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराचा शिलान्यास झाला. २०४७ च्या देवोत्थान एकादशीस पुनश्च श्रीराम मंदीर पुनर्निर्माण कार्यास पुढे नेण्यासाठी लक्षावधी हिंदूंनी तिथे करसेवा केली. मुस्लिम अनुनय करणाऱ्या क्रूर सत्ताधाऱ्यांच्या अनेक जुलूमांना विरोध करून करसेवा झाली त्यावेळी बंदुकीतील गोळ्यांच्या वर्षावात अनेक रामभक्तांचे बलिदान झाले. परंतु रामकार्यासाठी सर्वस्वार्पण करण्याचा संकल्प भंग होऊ शकला नाही. ६ डिसेंबर १९९२ (इ. स.) या दिवशी राजकीय आक्रमकाची निशाणी ध्वस्त करून रामललाचे छोटे मंदीर लक्षावधी हिंदूंनी निर्मिले. या रामललाच्या छोट्या मंदिरास भव्य स्वरूप देण्याच्या कार्यात अनेक अडथळे आणले जात आहेत.

जैन तीर्थंकर आदिनाथांचा जन्मही अयोध्येतच झाला. बौद्ध साहित्यात अयोध्या नगरीस 'साकेत' हे नामाभिदान आहे. वाल्मिकी रामायणात भगवान श्रीरामांनी अयोध्या या जन्मभूमीस स्वर्गापेक्षा महान मानले आहे. रावणवधानंतर अयोध्येविषयी 'जननिजन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि' ही भावना व्यक्त करून श्रीराम हे अयोध्येत परत आले. सीता रसोई, हनुमान गढी सारखे प्राचीन स्थळे तसेच अनेक नवीन मंदिरांची ही नगरी जैन, बौद्ध, शीख आदी सर्व पंथियांची पावन तीर्थनगरी आहे. इथे अनेक जैन व बौद्ध मंदिरे आहेत.

महानदी

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

मध्यप्रदेश व उत्कल (ओडिशा) प्रांतातील ही सर्वात मोठी नदी आहे. रायपूर जिल्ह्यातील सिंहवा पर्वतशृंखलेतून उगम पावून कटक जवळ अनेक धारांनी प्रवाहित होत गंगासागरास जावून मिळते. उत्कल प्रांताचे खूप मोठे क्षेत्र या नदीमुळे जलसिंचनाखाली आलेले आहे.

गोदावरी

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

ब्रह्मपुराणानुसार गौतम ऋषींनी भगवान शंकराच्या जटेतून गंगेस सह्याद्री पर्वतातील ब्रह्मगिरीच्या (त्र्यंबकेश्वर) आश्रमाजवळ नेले. यामुळेच ब्रह्मगिरीतून प्रकट झालेल्या गोदावरीस गौतमी तसेच दक्षिणगंगाही म्हटले जाते. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीत उगम पावून गोदावरी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेशातून जात गंगासागरास जावून मिळते. भगवान श्रीरामांनी गोदावरीकाठी नाशिक येथील पंचवटीमध्ये निवास केला होता. समर्थ रामदास स्वामींनी हिच्याच तीरावर १३ वर्ष घोर तपश्चर्या केली. गोदाकाठीच नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंहांची समाधी आहे. गोदावरीच्या किनाऱ्यांवरच नाशिक, पैठण, कोठीपल्ली, राजमहेंद्री, भद्राचलम् इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. ब्रह्मपुराणामध्ये गोदातटावर सुमारे शंभर तीर्थस्थानांचे वर्णन आहे. या तीर्थस्थानावरील अनेक मंदिरांचा मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केला. परंतु मराठा राजवटीच्या उत्कर्षकाळात अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण झाले. गोदा किनाऱ्यावरील नाशिक येथील पंचवटीतील काळाराम मंदिर हे दक्षिण पश्चिम भारतातील सर्वोत्तम मंदिरांमध्ये गणले जाते. याच मंदिरामध्ये उपेक्षित बांधवांना प्रवेश देवून शेष हिंदू समाजाशी समरस होण्यासाठी भारतरत्न डॉ आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता.

कृष्णा

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वरला उगम पावून कराडजवळून ही पुण्यसलीला नदी कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश मधून प्रवाहित होत गंगासागरास जावून मिळते. दक्षिण भारतातील मोठ्या नद्यांपैकी ही एक नदी आहे. हिला महाभारतात 'रोगनाशकारिणी' म्हटले गेले आहे. राजनिघण्टुनुसार या नदीचे पाणी स्वच्छ, रोचक, दीपक व पाचक आहे. कोयना, भीमा आणि तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख सहाय्यक नद्या आहेत.

रेवा

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

पुराणांमध्ये उल्लेखित रेवा नदी नर्मदा या नावाने प्रसिद्ध आहे. विंध्य पर्वतातील अमरकंटक शिखरातून ही नदी उगम पावते व गुजरातमधील भडौच जवळ सिंधूसागरास जाऊन मिळते. पौराणिक मान्यतेनुसार रेवा नदी महादेवाच्या शरीरापासून उत्पन्न झालेली आहे. रेवा नदीच्या किनाऱ्यावर भेडाघाट, ओंकारेश्वर, मांधाता, शुक्लतीर्थ, कपिलधारा इ. तीर्थस्थाने आहेत. स्कंदपुराणातील रेवा खंडात या तीर्थस्थानांचे विस्तृत वर्णन आहे. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकरांनी निर्मिलेली अनेक मंदिरे नर्मदेच्या किनाऱ्यावर आहेत.

यमुना

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

ही उत्तर भारतातील पवित्र नदी, हिमालयातील यामुनोत्री शिखरावरून निघून उत्तरप्रदेशातील प्रयागक्षेत्री गंगेस जाऊन मिळते. गंगा-यमुनेचे हे संगमस्थान 'तीर्थराज' मानले जाते. या नदीच्या किनाऱ्यावर इंद्रप्रस्थ (दिल्ली), मथुरा, वृंदावन सारखी ऐतिहासिक व धार्मिक नगरे वसलेली आहेत. नीलवर्णा यमुना नदीशी श्रीकृष्णाच्या जीवनाचा जवळचा संबंध आहे. कृष्ण भक्ती साहित्यात कृष्णाच्या यामुनेशी असलेल्या सहचर्यामुळे यमुनेचेही महात्म्य वर्णिलेले आहे. पुराणांमध्ये यमुनेला सुर्यकन्या म्हणून उल्लेखिले असून वेद आणि ब्राह्मणग्रंथातही यमुनेचा वारंवार उल्लेख आलेला आढळतो.

कावेरी

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

कुर्ग प्रदेशातील सह्याद्रीच्या दक्षिण भागातून उगम पावून ही पवित्र नदी कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांतातून प्रवाहित होत पूर्व समुद्रकिनाऱ्यावर गंगासगरात सामावते. या नदीच्या प्रवाहमार्गावर तीन ठिकाणी आदिरंगम्, शिवसमुद्रम् तसेच अंतरंगम् नावाचे तीन पवित्र द्वीप आहेत, जिथे विष्णुमंदिरे निर्मिलेली आहेत. उत्तर भारतात जे गंगेचे स्थान आहे तेच दक्षिण भारतात कावेरीचे आहे. कावेरीमधून निघणाऱ्या कालव्यांनी तामिळनाडू मधील शेती समृद्ध केली आहे.

गण्डकी

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

नेपाळमध्ये मुक्तीनाथजवळ दामोदर कुंडातून उगम पावलेली गण्डकी बिहार प्रांतातून प्रवाहित होत गंगेस मिळालेली आहे. ही नदी पवित्र शाळीग्राम शिळांसाठी प्रसिद्ध असून या शाळीग्रामांची पूजा भगवान विष्णूचे प्रतीक मानून केली जाते. यामुळेच या नदीचे नाव नारायणी देखील आहे.

ब्रह्मपुत्र

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

हिमालयातील पवित्र मानसरोवराजवळच ब्रह्मपुत्राचे उगमस्थान आहे. हा महानद पूर्वेकडे प्रवाहित होत आसाम आणि बंगालमधून जात गंगासागरात विलीन झालेला आहे. भारतातील नद्यांमध्ये ब्रह्मपुत्रेची लांबी सर्वाधिक आहे. खूप दूरपर्यंत तिबेटमध्ये 'सांपो' नावाने संबोधली गेलेली ही महानदी अरुणाचल प्रदेशच्या उत्तर सीमेवरून भारतात प्रवेश करते. गौहत्ती (गुवाहाटी) मध्ये ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर एका पर्वतशिखरावर कामाख्या देवीचे पवित्र शक्तीपीठ आहे. अपुनर्भव, भस्मकूट आणि कर्णेश्वर इ. अनेक तीर्थक्षेत्र ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर आहेत.

सिंधू

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

या पवित्र नदीचा वैदिक साहित्यात उल्लेख आहे. हिमालयातील कैलास पर्वतशिखरापासून जवळच असलेल्या मानसरोवरापासून उगम पावून ही नदी काश्मीर, पंजाब, सिंध प्रांतांतून प्रवाहित होत सिंधू सागरास जाऊन मिळते. सिंधू नदी ही वेदांमधील उल्लेखित नदी असून, हिच्या किनाऱ्यावर वैदिक संस्कृतीचा विकास झाला. 'हिंदू' शब्द सिंधूपासूनच बनला असल्याचीही मान्यता आहे. सिंधू आणि तिच्या सहाय्यक नद्यांसहित सात नद्यांचा प्रदेश 'सप्तसैंधव' म्हणून ओळखला जात असे. वैदिक सभ्यता-संस्कृती इथे फुलली-फळली. परंतु आज या नदीचा फार थोडा भाग भारतात असून बहुतांश दुर्दैवाने पाकिस्तानात आहे.

सरस्वती

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

वेदांमध्ये उल्लेखित पवित्र सरस्वती नदी आजच्या हरियाणा, राजस्थान व गुजरात प्रांतातून प्रवाहित होवून सिंधुसागरात विलीन झालेली होती. कालांतराने ही नदी लुप्त झाली (वैज्ञानिक दृष्ट्याही आता हे सिद्ध झालेले आहे). सरस्वतीचे किनारे हे ऋषी-मुनींची तपोभूमी राहिलेले आहेत. सरस्वतीच्या सभोवतालचा प्रदेश 'सारस्वत प्रदेश' म्हणून ओळखला जात असे, जो सांस्कृतिक संपन्नतेसाठी सुविख्यात होता. पुराणांमध्ये सरस्वतीला ब्रह्मदेवाची पत्नी तसेच ब्राह्मण ग्रंथांमध्ये वाणीची देवता म्हटले गेले आहे. या नदीच्या तटवर्ती प्रदेशातील विद्या-वैभव संपन्नतेमुळेही 'सरस्वती' हे नामाभिधान प्राप्त झालेले असणे शक्य आहे. आपल्या राष्ट्राचे, संस्कृतीचे विश्वातील सर्वाधिक प्राचीनत्व या नदीवरून सिद्ध होते.

गंगा


गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

भारतातील सर्वात पवित्र नदी, जिला 'पापनाशिनी', 'सुसरीता', 'भागीरथी', 'जान्हवी' इ. अनेक नावांनी संबोधले जाते. हिमालयातील गंगोत्री हिमानीच्या गोमुख विवरातून उगम पावून गंगा हिमालयातील अनेक पर्वतरांगा-शिखरावरून हरिद्वार येथे मैदानी प्रदेशात प्रवेश करते. उत्तरप्रदेश, बिहार, बंगालच्या भूभागांना पावित्र्य प्रदान करीत ती गंगासागर येथे समुद्रास मिळते. ऋग्वेदातील नदीसूक्तानुसार भारतातील सर्वात प्राचीन नदी गंगा आहे. गंगेच्या किनाऱ्यावर हरिद्वार, प्रयाग, काशी सारखे अनेक सुप्रसिद्ध पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. गंगेच्या किनाऱ्यावरच अनादी काळापासून ऋषी, मुनी, तपस्वी लोक साधना करीत आले आहेत. पवित्र व निर्मलतेला गंगाजलाची उपमा दिली जाते. गंगाजलाची स्वयंशुद्धीची क्षमता ही जगातील सर्व पाण्यापेक्षा अधिक असल्याचे वैज्ञानिक प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. या पावन नदीस हिंदू समाज माता किंवा मैय्या म्हणून संबोधतो. पुरणांनुसार गंगा ही विष्णूच्या चरणापासून उत्पन्न झाली, ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये सामावली जाऊन भगवान शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण केले. सागरवंशीय राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगेस पृथ्वीवर अवतीर्ण केले. भागवत पुराणामध्ये यासंबंधी विस्तृत कथा दिलेली आहे. आदित्य पुराणानुसार गंगेचे पृथ्वीवर अवतरण हे वैशाख शुद्ध तृतीयेस झाले तसेच हिमालयातून गंगा ज्येष्ठ शुद्ध दशमीस प्रवाहित झाली.

अरावली

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।

राजस्थानचा हा प्रमुख पर्वत. उत्तर पश्चिम दिशेकडून होणाऱ्या आक्रमणांना याच पर्वताने रोखले. महाराणा प्रतापांचे शौर्य व पराक्रमाचा साक्षीदार आणि प्रतापांची कर्मभूमी हाच पर्वत आहे.सुप्रसिद्ध हल्दीघाटी या पर्वताच्याच रांगावर स्थित आहे. अरावलीच्या सर्वोच्च शिखराचे नाव आबू (आर्बुदाचल) आहे. याचं शिखरावर जैन संप्रदायाचे पवित्र तीर्थस्थान आहे. या पर्वताचे प्राचीन संस्कृत नाव 'परिमात्र' होते. याची गणना प्रमुख सात कुळपर्वतांमध्ये होत होती.

सात कुळपर्वतांची नावे पुढील श्लोकात आढळतात.
महेन्द्रो मलय सह्यो शुक्तिमान् ऋक्षवानपि ।
विन्ध्यश्च परिमात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ।।


विंध्याचल

महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।

भारताच्या मध्यभागात गुजरातपासून बिहारपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण पर्वतात नर्मदा व शोणभद्र नद्यांची उगमस्थाने आहेत. देशातील सात कुळपर्वतांपैकी विंध्याचल हा एक मानला जातो. असे मानले जाते की भारताला दक्षिण व उत्तर भागात विभाजित करणारा विंध्य पर्वत ओलांडून अगस्ती ऋषी दक्षिणेत गेले व त्यांनी उत्तर व दक्षिण भारतास एकसूत्रात गुंफण्याचे यशस्वी प्रयत्न केले.
पुराणांनुसार हा पर्वत हिमालयाशी स्पर्धा करत मेरूपेक्षाही उंच होत होता. परंतु महर्षी अगस्ती या पर्वताकडे गेल्यानंतर आपल्या गुरूपुढे नतमस्तक होण्यासाठी हा पर्वत थोडा खाली आला. दक्षिणेतील प्रवास संपवून परत येईपर्यंत अशाच विनम्र अवस्थेत राहण्याचा महर्षींनी विंध्याचलास आदेश दिला. त्यानुसार तो त्यांची प्रतीक्षा करीत आहे. 'अमरकंटक' हे रमणीय तीर्थक्षेत्र याच पर्वतशृंखलेवर आहे.

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...