Thursday, February 13, 2020

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजाबमधील धार्मिक व ऐतिहासिक नगर आहे. या नगरीतील तीर्थस्थळनिर्मितीचा शुभारंभ शीख पंथातील चौथे गुरू श्री रामदासजी यांच्याकडून इ. स. १५७७ मध्ये झाला. मंदीर निर्मितीपूर्वीच चहूदिशांनी एक तलाव खोदण्यात आला. मंदीर निर्मितीचे कार्य पाचवे गुरू अर्जुनदेवांनी हरिमंदिर बनवून पूर्ण केले. सरोवर व हरिमंदिराच्या चारही दिशांना भव्य दरवाजे आहेत, ज्यामुळे सर्व बाजूंनी श्रद्धाळू भक्तगण प्रवेश करतात. महाराज रणजितसिंह यांनी या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी खूप द्रव्य खर्च केले. १३ एप्रिल १९१९ रोजी इंग्रज शासनाच्या काळात या सुवर्णमंदिरापासून दोन फर्लांग अंतरावर असलेल्या जालियनवाला बागेत स्वातंत्र्यमागणी करणारी शांततापूर्ण सभा चालू असताना जनरल डायरने नृशंस गोळीबार केला, प्रचंड नरसंहार झाला. इथे या बलिदानी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारक निर्मिलेले आहे. 

सोमनाथ

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

गुजरातच्या दक्षिणी समुद्रकिनाऱ्यावर प्रभास नावाचे तीर्थस्थान प्राचीन काळापासून अत्यंत वैभव संपन्न नगर होते. येथील सोमनाथ नावाचे शिवमंदिर त्याच्या भव्यतेसाठी व वैभवसंपन्नतेसाठी जगात प्रसिद्ध होते. कालांतराने प्रभास नगर सोमनाथ नावानेच प्रसिद्ध झाले. लुटारू, आक्रमक महंमद गज़नवीने सोमनाथवर हल्ला करून मंदीर उध्वस्त केले. गज़नवीपासून औरंजेबापर्यंत मुसलमान वारंवार हल्ले करून मंदीर उध्वस्त करीत राहिले व पुन:पुन्हा हिंदूंकडून पुनर्निर्माणही होत गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नांनी या मंदिराची अलीकडच्या काळात पुनर्बांधणी झालेली आहे.

इंद्रप्रस्थ

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

महाभारतात उल्लेखिलेले, पांडवांनी वसविलेले हे नगर आत्ताच्या दिल्लीजवळ होते. असे मानले जाते की पूर्वी इथे खांडव नावाचे घनदाट अरण्य होते. ते जंगल तोडून नगर वसविले होते. दुर्योधनाच्या कपटनीतीनुसार त्यास हस्तिनापूर स्वतःस हवे असल्याने कुरुवंशीय राज्याचे विभाजन करून हा जंगली प्रदेश पांडवांना देण्यात आला होता. मय नावाच्या दानवाच्या अद्भुत स्थापत्यकलेमुळे कल्पनातीत इंद्रप्रस्थ निर्मिले गेले. युधिष्ठिराने येथेच राजसूय यज्ञ केला होता. इंद्रप्रस्थ नगरीने इतिहासात अनेक उत्थान-पतन पाहिले

विजयनगर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।


 कलि युगाब्द ४४३७ (इ. स. १३३६) मध्ये पू. विद्यारण्यस्वामी (माधवाचार्य) यांच्या मार्गदर्शनाने हरिहर व बुक्कराय या वीरबंधूंनी विजयनगरच्या साम्राज्याच्या या राजधानी नगरीची निर्मिती केली. आपले गुरू विद्यारण्यस्वामींच्या नावावरून या नगरीस विद्यानगर हे नाव दिले गेले, कालांतराने विजयनगर म्हणून प्रस्थापित झाले. ही ऐतिहासिक नगरी तुंगभद्रा नदीकिनारी वसली होती. वेदमूलक हिंदूधर्म व संस्कृतीची सुरक्षा आणि संवर्धनाचे या साम्राज्याचे उद्दिष्ट होते. हिंदू साम्राज्य संस्थापक संगमवंशीयांनंतर सलुववंश, तुलुववंशीय पराक्रमी राजवंशांचे इथे अधिपत्य राहिले. तुलुववंशीय राजा कृष्णदेवरायांनी विजयनगर साम्राज्याचा उत्कर्ष केला आणि आक्रमक मुसलमानांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. विजयनगरचे हिंदू साम्राज्य युगाब्द ४४३७ ते ४६६६ (इ. स. १३३६ ते १५६५) पर्यंत उत्कर्ष पावलेले होते. या साम्राज्याचे विदेशांशी व्यवहार संबंध होते.

पाटलीपुत्र

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

आज बिहारमध्ये असलेली बिहारची राजधानी म्हणजे प्राचीन पाटलीपुत्र नगरी होय. अनेक साम्राज्ये व राजवंशांची ही राजधानी राहिलेली ही नगरी, आज पटना म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळात या नगरीस पाटलीपुत्र, कुसुमपूर, पुष्पपूर अथवा कुसुमध्वज या नावांनी ओळखले जात होते. गंगा आणि शोणभद्र नदीच्या संगमावर हे नगर वसले आहे. इसवीसनापूर्वी शेकडो वर्षे भगवान बुद्धांचे अनुयायी अजातशत्रू नावाच्या राजाने ही नगरी वसविली.स्वतः महात्मा बुद्धांनी या नगरीच्या परमोत्कर्षाविषयी भविष्यवाणी केली होती. ही नगरी दीर्घकाळपर्यंत मगध राज्याची राजधानी राहिली. या नगरीने नंद, मौर्य, शुंग आणि गुप्त वंशाच्या महान साम्राज्यांचे निर्मिती, उत्थान व पतन पाहिले आहे. शीख पंथाचे दहावे गुरूगोविंदसिंगजींचा जन्म याच नगरीत झाला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसादांची ही कर्मभूमी राहिलेली आहे.

प्रयाग

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् ।
इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।।

उत्तरप्रदेशात गंगा यमुनेच्या संगमावर वसलेलं 'प्रयागराज' हे प्राचीन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, असाधारण महात्म्यामुळे यास तीर्थराज म्हटले जाते. सरस्वती नदीही गुप्त रूपाने याच संगमात विलीन होत असल्याने या स्थानास त्रिवेणीसंगम म्हटले जाते. प्रयागमध्ये दर वर्षी माघमेळा, दर सहा वर्षांनी अर्धकुंभ व प्रति बारा वर्षांनी विराट स्वरूपाचा कुंभमेळा संपन्न होत असतो. या प्रसंगी कोट्यावधी साधू, महात्मे, संत, श्रद्धाळू इथे पवित्र पर्वस्नान करतात. प्रजपतीने इथे यज्ञ केलेला असल्याने या क्षेत्रास प्रयाग हे नाव पडले असावे. भरद्वाज मुनींचा प्रसिद्ध गुरुकुल आश्रम इथेच होता. वनवासात जतेवेळी श्रीराम, सीता व लक्ष्मण इथे थांबले होते. संत तुलसीदास रचित रामचरितमानसानुसार इथेच याज्ञवल्क्य ऋषींनी भरद्वाजमुनीस श्रीरामकथा कथन केली होती. सम्राट समुद्रगुप्ताचे वर्णन असलेला एक उत्कृष्ट शिलास्तंभ प्रयागमध्ये प्राप्त झाला आहे. प्रलयकाळातही नष्ट होत नाही अशी मान्यता असलेला सुप्रसिद्ध अक्षयवटवृक्ष इथेच आहे. या श्रद्धाभावनेस नष्ट करण्यासाठीच आक्रमक मुसलमानांनी, प्रामुख्याने जहांगीरने हा अक्षयवटवृक्ष तोडण्याचे खूप प्रयत्न केले पण आजही तो विद्यमान आहे.

गया

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ।।६।।

पुराण, महाभारत व बौद्ध साहित्यात उल्लेखिलेले बिहार प्रांतातील फल्गू नदीकिनारी वसलेले गया हे प्राचीन नगर आहे. पुरणांनुसार गय नावाच्या महापुण्यवान विष्णुभक्त असुराच्या नावावरून या नगरीचे गया हे नामकरण झाले असावे. अशी मान्यता आहे की गयेमध्ये श्राद्ध पिंडदान केलेल्या व्यक्ती पापमुक्त होऊन ब्रह्मलोकात वास करतात. भगवान श्रीराम व धर्मराजाने इथेच पितृश्राद्ध केले होते. पितृश्राद्धासाठी हे प्रख्यात तीर्थक्षेत्र मानले जाते. विष्णूपदमंदीर हे येथील प्रमुख दर्शनीय स्थान आहे. गयेजवळच भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. हे स्थान बोधगया किंवा बुद्धगया म्हणून प्रख्यात आहे. सुप्रसिद्ध बोधीवृक्ष तसेच भगवान महात्मा बुद्धांचे विशाल मंदीर येथे विद्यमान आहे.

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...